Pages

Ads 468x60px

Thursday 27 August 2015

अताशा असे हे मला काय

अताशा असे हे मला काय होते?
कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते
बरा बोलता बोलता स्तब्ध होतो
कशी शांतता शून्य शब्दांत येते

कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते आत हळुवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा

असा ऐकू येतो क्षणांचा इशारा
क्षणी व्यर्थ होतो दिशांचा पसारा
नभातून ज्या रोज जातो बुडोनी
नभाशीच त्या मागू जातो किनारा

न अंदाज कुठले, न अवधान काही
कुठे जायचे, यायचे, भान नाही
जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे, न अनुमान काही

कशी ही अवस्था कुणाला कळावे?
कुणाला पुसावे? कुणी उत्तरावे?
किती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे?

अजून तरी रूळ सोडून

अजून तरी रूळ सोडून सुटला नाही डब्बा
आणि अजून तरी नाही अमच्या चारित्र्यावर धब्बा

आमच्या देखिल मनी आले चांदण्याचे पूर
आम्हांलाही दिसल्या शम्मा अन् शम्मेचे नूर
अजून तरी परवाना हा शम्मेपासून दूर
मैत्रिणीच्या लग्‍ना गेलो घालून काळा झब्बा

कुणी नजरेचा ताणून नेम केलेले जखमी
कुणी ओठांची नाजुक अस्त्रे वापरली हुकुमी
अन्‌ शब्दांचे जाम भरोनी पाजियले कोणी
मैखान्यातही स्मरले आम्हां मंदिर-मस्जिद-काबा

कधी गोडीने गाऊन गेलो जोडीने गाणी
रमलो ही जरी विसरून सारे आम्ही खुळ्यावाणी
सर्वस्वाची घेऊन दाने आले जरी कोणी
अजून तरी सुटला नाही हातावरला ताबा

कोण जाणे कोण मजला रोखून हे धरते
वाटा देती हाका तरी पाऊल अडखळते
कुठल्या शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते
मोहाहुनही मोहक माझी हुरहुरण्याची शोभा

लग्नातली देणी-घेणी

उन्मत्तसिंग नावाचा एक अत्यंत जुलमी राजा होता. त्याच्या छळाला व अत्याचाराला कंटाळून त्याची प्रजा आपआपली गावे सोडून, दुसऱ्या राज्यात जाऊ लागली. त्याचा प्रधान चतूर व प्रामाणिक होता, पण राजाला काही सांगू जाणं, म्हणजे स्वत:चं मरण स्वत:च ओढवून घेण्यासारखं होतं. त्यामुळे राजाला ताळ्यावर कसं आणावं, हा त्याच्यापुढे प्रश्न पडला.
एकदा तो प्रधान शिकारीसाठी रानात बराच दूरवर गेला असता त्याला एका झाडाखाली जप करीत बसलेला साधू दिसला. प्रधानाने घोडयावरुन उतरुन व त्या साधूजवळ जाऊन त्याला नमस्कार केला असता साधूनं त्याला विचारलं, 'कोन तुम्ही ?'
प्रधान म्हणाला, 'मी या राज्याचा मुख्य प्रधान आहे.'
ते एकुण गोसाव्यान विचारलं, 'राजाच्या जुलमाला कंटाळून प्रजा स्थलांतर करीत असताना, ते केवळ उघडया डोळ्यांनी बघत राहण्यासाठीच तुम्ही प्रधान झाला आहात काय?
यावर प्रधान म्हणाला, गोसावीबुवा ! मग मीही तुम्हाला विचारतो की, राजाच्या जुलमाला कंटाळून प्रजा घरेदारे सोडून दुसऱ्या राज्यात जाऊ लागली असताना तुम्ही केवळ 'राम राम' म्हणत राहून स्वत:चीच मुक्ती साधणार आहात काय ? ज्या समाजाच्या जिवावर आजवर तुम्ही जंगलात त्याला या जुलुमजबरदस्तीतून मुक्त करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं हे तुमचं कर्तव्य नाही का?'
प्रधानाच्या या प्रतिप्रश्नान काहीसा ओशाळून तो गोसावी म्हणाला, 'प्रधानजी ! मला झेपेल अशी कोणतीही कामगीरी तुम्ही मजवर सोपवा. या राज्याच्या जुलमी राजाला ताळ्यावर आणण्यासाठी मी माझे प्राणही पणाला लावीन . सुचतो आहे का तुम्हाला एखादा उपाय?' तो गोसावी याप्रमाणे म्हणताच त्या चतुर प्रधानाच्या मनात काहीतरी कल्पना आली आणि त्याने ती हळूच त्या गोसाव्याला सांगितली. गोसाव्याने त्याप्रमाणे वागण्याचे वचन देताच प्रधान तिथून निघून गेला.
दुसऱ्या दिवशी राजा उन्मत्तसिंगाचा दरबार भरला असता, एक सेवक आत आला आणि राजाला म्हणाला, 'महाराज ! पक्ष्यांची भाषा जाणणारा एक बैरागी बाहेर आला असून, तो आपली भेट घेऊ इच्छितो. त्याला आत पाठवू का?'
राजानं होकार देताच, आदल्या दिवशी प्रधानाला रानात भेटलेला तो गोसावी दरबारात आला व राजाला नमस्कार करुन म्हणाला, 'महाराज ! मी बहुतेक सर्व पक्ष्यांची भाषा जाणतो. मजकडून काही सेवा करुन घ्यायची असल्यास आपण ती घ्यावी. मला त्याबद्दल पैसे वगैरे काहीच नकोत.'
राजा प्रधानाला म्हणाला, 'प्रधानजी, आज संध्याकाळी आपण दोघे फ़िरायला जाऊ तेव्हा बैरागीबुवांनाही आपल्याबरोबर घेऊन जाऊ.' राजा असे म्हणाला व त्याने एका सेवकाला त्या गोसाव्याची राहण्या-जेवणाची चांगली व्यवस्था ठेवण्यास सांगितले.
संध्याकाळी फ़िरायला जाताना राजा व प्रधान यांच्याबरोबर अर्थातच तो गोसावीही होता. ते तिघे त्या राजधानीच्या शहराबाहेर जातात न जातात, तोच राजाने एका झाडाच्या फ़ांदीवर बसलेले पक्षी आपापसात चिवचिवत असलेले पाहिले. त्यांच्याकडे बोट दाखवून राजाने त्या गोसाव्याला विचारलं, 'बैरागीबुवा ! हे दोन पक्षी एकमेकांशी कय बोलत आहेत हो?'
त्या गोसाव्यानं त्या दोन पक्ष्यांच चिवचिवण थोडा वेळ लक्षपूर्वक ऎकल्याचा आव आणला आणि तो राजाला म्हणाला, ' महाराज ! ते दोन पक्षी एकमेकांशी जे बोलत आहेत, त्याचा अर्थ जर मी आपल्याला सांगितला, तर आपण मला जिवंत ठेवणार नाही.'
यावर राजानं अभय देताच तो गोसावी निर्भिडपणे म्हणाला, 'महाराज ! त्या फ़ांदीवरच्या दोन पक्ष्यांपैकी जो डाव्या बाजूला बसला आहे, त्याची मुलगी लग्नाची असून त्याने आपली मुलगी उजव्या बाजूला असलेल्या पक्ष्याच्या मुलाला देण्याची गोष्ट त्या पक्ष्याकडे काढली. यावर वरपिता असलेला तो पक्षी त्याला म्हणाला, 'तुझी मुलगी मी सून म्हणून आनंदाने स्वीकारतो, पण मुलीबरोबर 'स्त्रीधन' म्हणून शंभर गावे आंदण द्यायची तुझी तयारी आहे काय?'
राजा आश्चर्यानं म्हणाला, 'अरे वा: ! असं म्हणतोय तो वराचा बाप ? मग वधूचा बाप घासाघीस करुन, आदंण म्हणून द्यावयाच्या गावांची संख्या पन्नास पाऊणशेवर आणू पाहत असेल नाही का?'
गोसावी म्हणाला, 'नाही महाराज! तिथे उलटाच मामला चाललाय. वधूपिता परराज्यातून उडून आलेल्या वरपित्याला म्हणतो आहे, अहो. शंभरच काय घेऊन बसलात, सध्याच्या राजाची जुलमी राजवट जर अशीच आणखी एक वर्षभर चालू राहिली, तर वर्षभरात पाचशे गावातले लोक आपली घरदारं सोडून परराज्यात रहायला जातील. मग ती ओस पडलेली पाचशेच्या पाचशे गावं माझ्या भावी जावयाला मी आंदण म्हणून देईन. मात्र तुमच्या मुलाचं व माझ्या मुलीचं लग्न सध्या जमवून ठेवायचं आणि वर्षभरानं लावायचं.'
वास्तविक त्या दोन पक्ष्यांच्या चिवचिवण्याचा हा सोयीचा व केवळ काल्पनिक अर्थ त्या गोसाव्याने प्रधानाने आदल्या दिवशी त्याला केलेल्या मार्गदर्शनानूसार राजाला सांगितला, पण राजाला तो खरा वाटून, तो एकदम शरमून गेला. त्या दिवसापासून त्याच्यात बराच फ़रक पडला व तो प्रजेचं अपत्यवत पालन-पोषण करु लागला.

आनंदाचा परिजातक

छोटया छोटयाशा क्षणांतील
मजा चाखत जगता यावे
पार नसलेल्या आनंदाला मग
इवल्याशा मुठीत मावता यावे 
थकून सायंकाळी घरी आल्यावर
प्रसन्न वदनी दीप उजळावे
दाराआड लपलेल्या गंमतीने
चिमुकल्या पावलांचे रुप घ्यावे 
हेतूक - अहेतूक नाजूक कटाक्षांनी
मोहरत्या कळयांचे गंध व्हावे
जीवन डवरणा-या क्षणांना
धडकत्या स्पंदनांनी साक्ष रहावे
दाटून येणा-या स्निग्धतेतून
पोक्तशा मायेचे स्पर्श जाणवावे
जीवनाशी राखून जाळ अबाधित
विश्वासाने या मला वात्सल्य ल्यावे
चिमखडया गोड गोड बोलांना
भाबडे बोबडे प्रश्न पडावे
निरर्थक अशा हावभावांनीही
हसून हसून बेजार व्हावे 
पक्ष्यांचा ऐकत मंजूळ किलबिलाट
हिरव्याकंच साजाने नाचनाचावे
क्षितीजावर करुन सोनेरी उधळण
निसर्गाच्या कुंचल्याने परीस व्हावे
महाल गाडया नि शेतीवाडया
कशास यांचे अप्रूप वाटावे
फुलवाया मळे आनंद अंगणी
वणवण फिरण्या ते का लागावे
आनंदाचा असा पारिजातक
सदैव दरवळतो मनामनात
शोधावा तेव्हा तो सापडतो
आपला आपल्याच आंगणात

अजून उजाडत नाही

अजून उजाडत नाही ग !

दशकांमागुन सरली दशके अन्‌ शतकांच्या गाथा ग !
ना वाटांचा मोह सुटे वा ना मोहाच्या वाटा ग !
पथ चकव्याचा, गोल, सरळ वा- कुणास उमगत नाही ग
प्रवास कसला? फरफट अवघी ! पान जळातून वाही ग ..
अजून उजाडत नाही ग !

कधी वाटते ’दिवस’ ’रात्र’ हे नसते काही असले ग
त्यांच्यालेखी रात्र सदाची ज्यांचे डोळे मिटले ग
स्पर्श आंधळे, गंध आंधळे, भवताली वनराई ग
तमातली भेसूर शांतता .. कानी कूजन नाही ग ..
अजून उजाडत नाही ग !

एकच पळभर एखादी कळ अशी सणाणून जाते ग
क्षणात विरती अवघे पडदे लख्ख काही चमचमते ग !
ती कळ सरते .. हुरहुर उरते अन्‌ पिकण्याची घाई ग
वरवर सारे शिंपण, काही आतुन उमलत नाही ग
अजून उजाडत नाही ग !

नसतेस घरी तू जेव्हा

नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन्‌ चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकुन वारा
तव गंधावाचून जातो

तव मिठीत विरघळणार्‍या
मज स्मरती लाघववेळा
श्वासांविन हृदय अडावे
मी तसाच अगतिक होतो

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा?
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो !

शब्द फुलांचे

आम्हाला असं कधीच वाटलं नव्हतं
बाजारपेठेतील आपण खरेदीची वस्तू व्हावं..
स्टेजवरल्या मान्यवरांच्या स्वागतासाठी प्रेमाचं प्रतिक व्हावं अन,
स्वागतानंतर, विरहामुळे वा आणि कशाने कचरा पेटीत जायचं नव्हतं
कुणाच्या केसात तर कुणाच्या दप्तरात जावून कोमेजायचं नव्हतं
हिवाळ्यात काही दवबिंदू शरीरभर आदळून घ्यायचे होते
आम्हालाही काही दिवस आनंदाने जागायचे होते
एकाच्या स्वागतासाठी दुसर्याच्या गळ्यावर घाव-
हाच का भूतलावरचा न्याय म्हणून विचारायचं होतं
स्वप्नात तुम्हाला भीती घालावी तर आमच्यामुळे अधिकच चेकाळणार
आम्हावर तुम्ही अखेरपर्यंत अत्याचार करणार पण,
आम्हालाही काही दिवस आनंदाने जागायचे आहेत.
आम्ही स्वतः आमच्यातीलच काहीना चिरडलेलं पाहत होतो,
पण आम्हालाही इथे थांबायला फारच कमी वेळ होता.

माझा पाऊस

पाऊस सगळ्यांचाच असतो
सगळ्यांनी तो भोगलेलाही असतो
मलाही पाऊस माहीत आहे
मीही पाऊस कधीतरी
भोगलेला आहे
झेललेलाही आहे
माझ्यासाठी
पाऊस म्हणजे
फक्त एक आठवण
लहानपणी माझा बाप
जेव्हा मारायचा
माझ्या आईला
योगायोगाने नाही
पण
पाऊस बाहेर
पडत रहायचा
माझ्या आईचे
पाणावलेले डोळे
मला फक्त दिसायचे
तिच्या डोळ्यातील
पाऊस
तोच पाऊस
मला आठवतो
तोच पाऊस मला
माहित आहे
माझ्यासाठी
पाऊस म्हणजे
दु:ख, यातना, क्लेष
अश्रू, हंबरडा
आणि मूक विलाप
माझ्या आईचा
पाऊस म्हणजे
माझ्यासाठी नेहमीच
पाण्याचा अर्थहीन
थेंबांचा
आणि
माझ्या गेलेल्या
आईच्या आठवणींचा

फुल

आयुष्य जरी एक दिवसाचे
काम त्याचे लाख मोलाचे
सुख दुःखात असतो सोबती
फुलांची ही थोर महती
घेवू शिकवण आपण फुलांकडून
सुख दुःख वाटू सर्व मिळून
आयुष्यात असेल आपल्याही सुगंध
दृढ होतील ॠणाणुबंध

ध्यास

जरी मी संपलो इथे
प्रवास संपणार नाही
चार लाकडांसोबत
माझा ध्यास जळणार नाही
राख निजेल मातीच्या कुशीत
स्वप्ने निजणार नाही
राहतील रेंगाळत येथेच
पण सावली दिसणार नाही
अगणित आकांशा
क्षणात संपत नसतात
पेटतात मंद चांदण्यांसारख्या
पेटतात तेजस्वी ताऱ्यांसारख्या
मावळतील दिवे
अंधार पसरेल चहुबाजू
सायंकाळ येईल
काळे वस्त्रे परिधान करून
त्याच क्षणी
सूर्य उगवलेला असेलच कोठेतरी
त्याची आग विझणार नाही
विझलेली मशाल
पुन्हा पेटवतील
असंतोषाचे हात
होईल सुरु
एक नवा प्रवास
तीच वाट धरून
पोहोचेल तो
परिवर्तनाच्या क्षितिजावर
तोपर्यंत त्याची पापणी
तुफानातही लवणार नाही

आयुष्याचा भागीदार

तिच्या दिशेने पावलं
आपोआप माझी वळतात
मलाही उमजेना अशा
वाटेला भावना कळतात
भव्यतेची ओढ मला
स्वप्नं माझी साहसी
झोका घेता आकाशी भिडे
ती ही आहे धाडसी
पुस्तकांचे ओझे माझे
ती लिलया पेलेल का?
झेप घेऊनी धडपडलो
तर ती मला झेलेल का?
नेम अचूक स्थैर्य तिच्या हाती
तीक्ष्ण विचारांचे बाण
सोसेल का तिच्या बुद्धीला
माझ्या धनुष्याचा ताण
खळाळते हास्य तिचे
नम्रतेचा शृंगार
तिच्या तेजस्वी डोळ्यात दिसे
मला आयुष्याचा भागीदार